Saturday, May 14, 2016

सैराट --- एक झिंगाट अनुभव

असं म्हणतात कि कुठलिही निर्मिती एकदा लोकांना अर्पण केली कि ती लोकांची होऊन जाते. प्रत्येक जण तिला आपापल्या मनचक्षुंनी, आपापल्या अनुभव विश्वातुन आणि पर्यायाने आलेल्या पुर्वग्रहातुन, आपापल्या कुवतीनुसार बघतो. आपापले अर्थ काढतो आणि त्याचा आस्वाद घेतो.

’सैराट’ मला असाच बघायचा होता, पुर्णपणे मोकळी, कोरी पाटी घेउन. कुठल्याही गोष्टीचा कुठलाही अर्थ न लावता, जस दिसेल तस फक्त मेंदुमधे record करत, त्याचे कुठलेही analysis न करता बघायचा होता.
आणि मी तसाच बघितला. आवडला. खरंच आवडला. त्यातिल एक एक फ्रेम तुमच्या मेंदुवर अतिशय ठळक impression पाडत जाते, तुम्हाला नको असेल तरिही. तुम्ही अचंबित होत जातात, कि अरे ह्यातिल विश्व माझ्या विश्वाच्या खूप खूप दूरचे आहे, हे असे मी कधी अनुभवलेले नाही, पाहीलेले नाही, आणि तरिही मला ते भावतं आहे.

चित्रपटाच्या जमेच्या बाजु आणि काही highlight scenes असे....
१. त्याचा Rawness. कुठल्याही प्रतिथयश कलाकाराला, अथवा acting school मधुन शिकुन आलेल्या कलाकारांना घेउन कचकड्याचे गावचे वातावरण तयार केलेले नाही. अगदी संपुर्ण cast (except ज्योती सुभाष) अशी थेट त्याच गावातुन उचललेली. हे त्या चित्रपटाचे वैशिष्ठ आहे. कोणी स्मिता पाटील, नंदिता दास, शबाना आझमी अथवा तत्सम कसलेल्या अभिनेत्री अथवा, नसिर, ओम किंवा तत्सम कसलेले अभिनेते नाहीत.
तरिही सर्वांचा उत्कृष्ट अभिनय.
२. हिरो आणि हिरोईन दोघेही अतिशय आवडले. आर्ची (रिंकु) तर आहेच छान, तिचे कौतुकही होते आहे, पण मला तर परशा पण खुप आवडला.
३. सगळ्या रुढ नायिकेच्या कल्पनांना झुगारुन देणारी, बिन्धास्त आर्ची. बुलेट, ट्रॆक्टर चालविणारी, घोडसवारी करणारी आणि पिस्तोल देखिल चालविणारी आर्ची हि खरोखर वाघिण आहे. नायकाला बिन्धास्त response देणारी, आव्हान देणारी रांगडी आर्ची कुणालाही भावेल, भुरळ पाडेल अशिच आहे.
हि नायिका खरे तर बिन्धास्त आणि नायक लाजरा बुजरा कवी मनाचा आहे. म्हणजे नायिका हिच खरी चित्रपटाची हिरो आहे (रुढार्थाने मान्य ’हिरो’ च्या व्याख्येनुसार).
लग्न झाल्यानंतरही, हैद्राबादला जेव्हा एक मवाली मुलगा तिच्याकडे टक लावुन बघत असतो तेव्हा कुठेही घाबरुन न जाता, परशाला न उमगु देता, स्वत: त्याला खुन्नस देते. हा सिन देखिल चित्रपटातिल अनेक हायलाईट शॉट्स पैकी एक आहे. 
४. चित्रपटाची Cinematography उत्कृष्ट. हा संपुर्ण चित्रपट खरंतर दिग्दर्शकाचाच आहे. त्याची sensitivity, संवेदनशिलता अगदी पावला पावला गणिक जाणवते, त्याच्या प्रत्येक फ्रेममधे ह्या दिग्दर्शकाची संपुर्ण निर्मितीवर असलेली पकड, त्याचा intelligence दिसतो. पण तरिही त्याचे आस्तित्व subtle आहे. कुठेही ते कथानक, पात्र आणि इतर कुठल्याही गोष्टीवर हावी होत नाही. 
"हो हे माझच आहे सर्व, पण ह्यातिल प्रत्येक गोष्टीला आपापले फुलण्यास वाव आहे, स्वत:चे आस्तित्व दाखविण्यास वाव आहे" असं दिग्दर्शक सांगुन जातो.
५. चित्रपटातिल शेवटचे दृष्य जे त्या छोट्या मुलावर दिग्दर्शित केले आहे ते अतिशय सुन्न करणारं आणि परिणामकारक. तो सिन तसा सुचणं आणि तो जर तसा पहिल्यांदीच वापरला असेल तर माझा दिग्दर्शकाला सलाम.

आता चित्रपटाचे काही weak points...
1. ह्या चित्रपटाचा मध्यंतर २ तासांनी होतो. तो खुप लांबणीवर टाकलेला आहे. त्यामुळे थोडासा चित्रपटाचा पेस जातो.
२. मध्यंतरापुर्व चित्रपट खुप फ़ास्ट आहे, पण मध्यंतरानंतर तो स्लो होतो. ते खटकतं. कधी कधी तर आता हा कधी संपणार असे वाटुन जाते. मध्यंतर लवकर घेऊन, सेकंड हाफ़ सुद्धा तसाच फ़ास्ट आणि crisp ठेवला तर अजुन मजा आली असती.
३. कुठेतरी टिपिकल स्लो चालणारे आर्ट सिनेमे आणि mass appeal वाले व्यावसायिक सिनेमे ह्यांत गोंधळ झाला आहे. पहिला भाग अगदी व्यावसायिक पद्धतिने घेतलेला आहे, म्हणजे उगिचच, एक एक फ़्रेम , स्क्रिनवर काहीही न घडता कित्येक मिनिटे चालु ठेवुन लोकांना पकवायचं हे आर्ट सिनेमाचे तंत्र पहील्या भागात वापरलेले नाही, पण दुस-या भागात कुठेतरी दोन genre मधे संभ्रम झालेला वाटतो.
आता काही overly hyped points बद्दल
१. मराठीत अशा प्रकारचा चित्रपट कदाचित पहिल्यांदाच अथवा कमी वेळा झाला असेल, पण मी इतकेच raw, रांगडे, अर्थपुर्ण सिनेमे मल्याळम आणि तामिळ भाषेतिल पाहीले आहे. Rather मल्याळम मधिल बहुतांश चित्रपट हे असे इतकेच सच्चे, त्यांच्या मातितले, कुठेही हिंदी चित्रपटांसारखा भडकपणा, glossyness, larger than life characters असले प्रकार मल्याळम चित्रपटात पाहीले नाहीत.
जात - पात वगैरे विषय देखिल तिथे समर्थपणे हाताळलेले आहेत. त्यामुळे मराठीला हा धक्का असला तरी, हि भारतात ह्या प्रकारची प्रथम घडणारी कलाकृती नाही.
Rather, to be honest मला ह्या चित्रपटाचे handling, treatment, genre हे सर्व सर्व साउथच्या चित्रपटांशी साधर्म्य असलेलं वाटलं.
आता जाता जाता....
मी सुरवातीलाच लिहिल्याप्रमाणे मी हा चित्रपट कुठलेही पुर्वग्रह न ठेवता कोरी पाटी घेऊन, माझ्या अनुभव विश्वातुन बघितला. शहरात वाढल्यामुळे, खेडेगावात तर कुठलेही नातेवाईक पण नसल्याने मला हि दुनिया फार दूरची आहे. घरात माझ्यावर जातीपातीचे कुठलेही संस्कार कधिच झाले नाहीत. त्यामुळे हा चित्रपट बघतांना मला त्यात जातिय रंग दिसलाच नाही. दिसली ती फक्त एक भन्नाट, जिगरबाज love story. दोघांमधे आर्थिक स्तर वेगवेगळा आहे आणि त्यामुळे तिची नंतर होणारी ससेहोलपट जाणविली. पण जाती भेद ना कधी मी पाळला, ना त्याचे ज्ञान मला घरच्यांनी दिले आणि त्यामुळे मी जातीच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन हा चित्रपट बघितला. 
दिग्दर्शकाने देखिल कुठेही जात-पात हा केंद्रबिंदु चित्रपटात ठेवला आहे असे वाटले नाही. दोघे जेव्हा कॉलेज मधे स्वत:ची ओळख करुन देतांना संपुर्ण नाव सांगतात, बहुधा खुप subtly दिग्दर्शकाने जात तिथेच establish केली. बाकी चित्रपटात explicitly कुठेही जातीचा उल्लेख नाही आहे. हो शेवट हा मानला तर जातिय संस्थेतून होणाऱ्या कलहाचे outcome असू शकते, पण ते तसे न मानता बघितले तरी फरक पडत नाही.