Friday, January 16, 2009

वोह कागज कि कश्ती वोह बारिश का पानी

आई मला PSP हवाय, माझ्या सगळ्या friends कडे आहे तो. only I dont have it". ' इति माझा ६ वर्षाचा मुलगा.
'अरे पण काही महिन्यांपुर्विच आपण तूला gameboy घेतला ना, तो खेळ ना " इति मी
'अग आई gameboy आता outdated झाला, मला PSP च हवा. त्यावर वेगळे games आहेत.' इति माझा ६ वर्षीय मुलगा.
इथे दुबईमधे शुक्रवार शनिवार हे जे सुट्टीचे वार असतात, तेव्हाच काय ते मुलांना एखाद्या club ची वैगरे मेम्बरशीप घेउन badminton, tennis अथवा इतर तत्सम जे socalled साहेबी खेळ आहेत ते खेळायला घेउन जाउ शकतो. एरवी शाळा असतांना बाहेर कुठेही मैदानी खेळ खेळायला मुलांना जाता येत नाही. वेळच नसतो. मग काय दिवसभर सतत cartoons बघणे किंवा computer games, game boy, play station वैगरे वैगरे खेळणे. नाही म्हणायला building मधली मुले येतात घरी खेळायला पण एकत्र जमून ह्यांचे पुन्हा computer games खेळणे चालते. परवा असाच मी माझा मुलगा व त्याचे building मधिल मित्र ह्यांचा एक खेळ बघत होते. हि मुले (सर्व मुले साधरणतः वयोगट ५-७ वर्षे) प्रत्येक जण cartoon मधली एक एक characters आहेत असे समजुन एकमेकांना खोटे खोटे बंदुकिने मारणे असा काहीतरी खेळ खेळत होते. तेव्हा मनात विचार आला आत्ताच्या मुलांचे खेळ, त्यांची करमणुकीची साधनं सगळं किति वेगळं आहे माझ्या बालपणापेक्षा.
माझे मन थेट भूतकाळात गेलं. ६ वर्षाची असतांना आम्ही कुठले खेळ खेळायचो? अर्थात सगळे मैदानी खेळ. आणि घरात बसुन खेळायचे असेल तर पत्ते वैगरे.
Technology चे आत्ताएव्हढे आक्रमण तेव्हा अर्थात झालेले नव्हते. मी ६ वर्षाची असतांना आमच्या नाशिकला साधा टेलिव्हि़जन देखिल आला नव्हता. तेव्हा Personal Computer नावाची गोष्ट तर आस्तित्वातच नव्हती. मग आम्ही काय करायचो? आत्ताच्या मुलांना तर प्रश्नच पडेल कि T.V. नाही, Computer नाही, PSP, gameboy, play station तर फार फार दूरची गोष्ट मग आपले आई-वडिल bore कसे नाही व्हायचे? कारण आत्ताच्या मुलांना इतकी सारी करमणुकीची साधनं उपलब्ध असुनसुद्धा '''I am getting bored' हे वाक्य आपल्याला अनेक वेळा ऐकु येतं. पण वेळ घालविण्याचा आम्हाला कधी problem नाही आला. माझ्या डोळ्यासमोर माझे बालपण आले. आणि अचानक खुप nostalgic वाटायला लागलं.
माझे बालपण गेले एकत्र कुटंबात, मला ३ काका. आजीचा हट्ट होता कि तीच्या चारही मुलांनी तीच्या जवळच राहिले पाहिजे. आणि म्हणुनच माझ्या आजी-आजोबांनी आपल्याच जागेत एक मोठी इमारत बांधली. प्रत्येक काकांचे घर एका मजल्यावर. धाकटे काका मात्र माझ्या आजीच्याच जुन्या घरी रहात. आजीचे बैठे घर होते ब-याच खोल्यांचे. आणि हे घर आणि आमची इमारत हे सगळे एकाच मोठ्या प्लॉट मधे होते. तशी जागा मोठी असल्याने आमच्या घरापुढे मोठ्ठ आवार, आणि आवारात एक विहिर देखिल होती. आजीच्या घरासमोर एक छानशी गच्ची, व तीच्यात एक झोपाळा. संध्याकाळी माझी आजी त्या झोपाळ्यावर हमखास बसायची. मग सर्व काका-काकु आजीला भेटायला संध्याकाळी त्या घरासमोरिल गच्चीत जमायचे, आणि मस्त गप्पा रंगायच्या. आंगणात सायली, जाई, जुई चे वेल, गुलाब, मोगरा अशी फुलांची झाडे होती, आवारात आंब्याची ३ मोठ्ठी झाडे, चिंच, विलायती चिंच, बुच असे मोठे वृक्ष. आंगण अनेक फळा -फुलांच्या झाडांनी भरलेले होतं.
संध्याकाळी आम्ही सर्व सख्खी आणि चुलत भांवंडे (एकुण आम्ही १२ भावंडे होतो), आणि आमचे इतर गल्लीतले मित्र-मैत्रीणी सर्व आमच्या आवारात जमायचो (मोठ्ठ आवार होतं ते), आणि अनेक खेळ खेळायचो. परदेशात रहाणा-या माझ्या मुलाला हे खेळ माहित देखिल नाहीत. लपंडाव, भोकांजा, डब्बा-ऐसपैस, रुमाल्-रुमाल, खांब खांब खांबोळी, आमच्या मुलींचा खेळ म्हणजे ठिक-या. धमाल करायचो आम्ही. शेवटी खेळून खेळून इतके दमलेले असायचो कि घरी जाउन हात्-पाय धुउन, जेवलो कि झोपलो.
मे महिन्यातील सुट्टी आणि दिवाळीतली सुट्टी म्हणजे आनंदाची पर्वणीच होती. प्रत्येकाचे आईकडील कोणी ना कोणी नातेवाईक म्हणजे आ़जी-आजोबा, मामे, मावस भावंड सुट्टीला नाशिकला येयचे. आणि वडिलांकडील नातेवाईक सगळ्यांचे common च होते, आत्या व आते भावंड देखिल येयचे आणि आम्ही सर्व चुलत भावंडं एकाच premises मधे रहात असल्याने, प्रत्येकाच्या आईकडील नातेवाईक हे आमचे देखिल तितकेच जवळचे होते. मग काय सुट्टीत लहान मुलांची संख्या अजुन वाढायची. सगळे मिळुन पत्त्यांचे असंख्य games खेळायचो. लहान वयातील मुले ७-८, ५-३-२, तर आम्ही लॅडीज, ३०४, बिझिक, बदाम सात, गुलाम चोर, चॅलेंज, not at home, judgement आणि असंख्य इतर पत्त्यांचे games खेळायचो. आणि हळुच इतरांचे पत्ते बघणे, खुप बदमाशी करणे वैगरे चालायचे. खरंच किती सुंदर दिवस होते ते. सगळ्या चिंतातून मुक्त जीवन.
दिवाळीत मस्त किल्ला बांधायचो. नर्कचतुर्दशीच्या दिवशी सकाळी सर्वात पहिले फटाका कोण लावणार ह्यांत चढाओढ असायची. माझा मोठा भाऊ सर्वात हुशार, तो रात्री १२ वाजता पहिला फटाका लावुन मग झोपायचा. म्हणजे सर्वात पहिला फटाका मी लावला होता हे म्हणायला मोकळा. दिवाळीच्या शेवटच्या दिवशी सगळ्यांच्या लवंगी माळ आणि इलेक्ट्रीक माळेचा (फटाक्याचा आमच्या लहान पणीचा एक प्रकार) जो उरलेला stock असायचा त्याची एकत्र एक मोठ्ठी माळ गुंफायचो आणि मस्त एक ५-१० मिनिट चालणारी लड वाजायची. काय काय उद्योग करायचो आत्ता आठवून मजा येते.
संक्रांत हा असाच एक अजुन उत्साही सण आमच्या साठी. पतंग आणणे, मग बरवलीचा मांजा आणणे आणि गच्चीवरुन मनसोक्त पतंग उडविणे. आम्ही मुली फक्त आमच्या भावांना cheering करण्यासाठी गच्चीवर जात असु. आणि मांज्याचे रिळ पकडण्यासाठी. पतंगाचे पेच लागायचे. मग समोरच्या rival group चा पतंग कटला की आम्ही जाम ओरडायचो. त्यांना चिड्वायचो. माझा चुलत भाऊ पतंग उडविण्यात expert होता. कटलेला पतंग तो बरोबर आपल्या पतंगाला लटकवुन खाली आणायचा. दुस-याची कटलेली पतंग आपल्या गच्चीत अथवा आंगणात आली कि आनंद गगनात मावेनासा होयचा.
आम्ही तर मांजा पण घरी बनविण्याचा उपद्व्याप केला आहे. साबुदाणा, कोरफड, काचेची बारिक भुकटी आणि अजुन काय काय अनेक विचित्र पदार्थ एकत्र करुन एक लुद्दी बनवायचो आणि ती धाग्याला लावायचो.
संध्याकाळी मग तिळ्गुळ वाटण्याचा समारंभ, अनेक गावातील नातेवाईक, ओळ्खीची लोके तिळ्गुळ वाटायला घरी येयचे. माझ्या आजीच्या घरी सगळा गोतावळा जमायचा. आम्ही लहान असलो तरी नटण्या मुरड्ण्याची भारी हौस. आणि आम्हा मुलींना अगदी चिमुरड्या होतो तरि साडी नेसण्याची जाम हौस. तेव्हा 'कल्पना' साडी नावाची साडी मिळायची लहाम मुलींकरिता.. ती शिवलेली असायची म्हणजे अंगात एखाद्या फ्रॉक सारखी घालता येयची. आम्ही अगदी चिमुरड्या असतांना ती कल्पना साडी घालायचो. आणि तिळ्गुळ देण्यासाठी-घेण्यासाठी प्रत्येकाच्या घरी फिरायचो.

तसेच अजुनही स्मरणात रहाते ती होळीपोर्णिमा. कुठुन कुठुन लाकडे गोळा करुन आणायचो, गव-या आणायचो आणि मस्त होळी पेटवायचो. त्यात मग आम्ही कांदे, बटाटे देखिल घालायचो. त्या कांदे-बटाटयाची चव काय सही लागायची. आजही परदेशात आम्ही बार्बेक्यु केला कि मन थेट त्या आठवणीतल्या होळीपोर्णिमेत जाते आणि ते तिखट मीठ लावून खाल्लेले कांदे, बटाटे आठवतात.
आमच्या आंगणात खोबरेल कैरीचे झाड होते, त्याच्या कै-या कमी आंबट असतात आणि हि कैरी खायला खुप चवदार असते. आसपासच्या ब-याच टवाळ मुलांचा त्या कै-यांवर डोळा असायचा. चोरुन ते आंगणात शिरत आणि आमच्या झाडावर चढुन त्या कै-या काढत. आम्ही देखिल त्या झाडावर चढुन कित्येकदा कै-या खाल्या आहेत, त्याचप्रमाणे चिंचा पण तोडल्या आहेत. हिरव्यागार गारुसलेल्या चिंचा, किंवा चिंचेमधे ति़खट-मीठ घालुन त्याची बनवलेली गोळी अजुन जीभेवर त्याची चव आहे. एकदा जेट एअरवेज मधे आम्हाला मस्त रॅपरमधे घातलेली चींचगोळी दिली तेव्हा अशीच मला लहानपणची आठवण झाली. संध्याकाळी ब-याच वेळा आम्ही मुली तेलपोहे करुन खायचो. खास मुलींचा आवडता प्रकार.

ह्या आणि अशा बालपणातील अनेक आठवणी आहेत. कधी वाटतं माझ्या मुलाला परदेशात राहिल्याने ह्या सर्व खेळांची, सणांची आमच्या सारखी मजा नाही लुटता येत. घरी इतके नातेवाईक येणे , मजा करणे त्याला बिचा-याला त्याची इतकी कल्पना नाही.

मला आमचा पहिला-वहिला T.V. देखिल आठवतो. Black & White होता. पण किती exciting आणि thrilling वाटलं होतं तो घरी आल्यावर. मग तो भला मोठ्ठा antenna गच्चीवरती लावायला लागायचा. तरी आम्हाला T.V. म्हणजे पाण्यातून बघावा असाच दिसायचा. अतिशय अस्पष्ट, त्यावर तारे चमकायचे. antenaa वर एखादा कावळा किंवा पक्षी बसला कि जे पाण्यातून दिसल्यासारखे चित्र दिसायचे तेही दिसेनासे व्हायचे. पण चिकाटी इतकी कि तरिही आम्ही T.V. बघायचो. नंतर मग दिल्लीतल्या एशियाड नंतर मग नाशिकला छान transmission येवु लागले. आम्हाला प्रत्येक गोष्टीचे अप्रुप होते. आत्ताची मुले त्यांना सगळे अगदी जन्मल्यापासुन मिळते.. त्यांना कशाचेच अप्रुप वाटत नाही. त्यात काय ह्या गोष्टी असतातच. ह्या जगात अगदी आदी कालापासुनच असल्या पाहिजेत असाच त्यांचा समज.
त्याकाळातील दूरदर्शनवरिल कार्यक्रम हा एक स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो. किती साधे, गोंडस कार्यक्रम होते ते. १३ भागात serial संपायच्या. Lucy Show, Different Strokes ह्या इंग्रजी मालिका आणि हमलोग, खानदान, एक कहानी, कथा सागर, मालगुडी डेज, ये जो है जिंदगी, पेईंग गेस्ट, सारख्या छान मालिका चालायच्या. रविवारी सकाळी दिसणारा तो जुन्या हिंदी गाण्यावरील कार्यक्रम 'रंगोली'.

तंत्रज्ञानात जे मैलाचे दगड ठरले त्याचे आम्ही साक्षिदार होतो. त्यातलाच एक V.C.R. देखिल. स्वतःचा V.C.R. घेण्याआधी आम्ही भाड्याने V.C.R. आणायचो. मग तो १ दिवसाकरिता आणलेला असल्याने मग अगदी जितके पिक्चर बघता येतिल तितके आम्ही बघुन घेयचो. ज्या काकांकडे V.C.R. आणला आहे त्यांच्याकडे मग सगळे जमुन दिवसभर पिक्चर बघणे चालायचे. नंतर प्रत्येकाने VCR विकत घेतला. आता गंमत वाटते ते सर्व आठवुन. आता काय हजारो T.V. चॅनेल्स, हजारो मालिका, आणि हजारो movie चॅनेल्स , आणि त्यामुळे कशाचेच काहिच वाटत नाही. आपल्या मुलांनातरी का दोष द्या?
रेडिओ ने देखिल माझ्या बालपणात अगदी महत्त्वाची भुमिका बजावली. १० वी १२ वीचा अभ्यास असो वा engineering चे submission असो रेडिओ हा माझा अगदी जिवलग साथी होता. त्यावरिल बिनाका गितमाला आठवड्यातुन एकदाच असायची पण आम्ही ती आवर्जुन ऐकायचो. अमीन सयानीची ती टिपिकल बोलण्याची पद्धत आम्हाला त्याची मजा वाटायची. मग ''आपकी फर्माईश", 'बेला के फुल", "फौजी भाईयोंके लिये'' तबस्सुम, असे अनेक कार्यक्रम अजुनही आठवतात. माझी आजी ''आपली आवड'' हा रेडिओवरिल मराठी गाण्यांचा कार्यक्रम ऐकायची. ती इतक्या मोठ्याने रेडिओ लावायची (कारण तीला वयोपरित्वे कमी ऐकु येयचे) कि तिच्या घरातील रेडिओ मला आमच्या घरी स्पष्ट ऐकु येयचा आणि किति तरी मराठी गाणी मला "आपली आवड" मुळे आणि actually माझ्या आजीमुळे माहिती झाली.

Computer नावाची गोष्ट, माझा मुलगा अगदी १ वर्षाचा असल्यापासुन अगदी सराईतपणे वापरतो. १ वर्षाचा असतांना माझ्या मांडीवर बसुन तो paint brush उघडणे, त्यात त्याला जमतील असे चित्र विचित्र आकार काढणे, word मधे type करणे इत्यादी उद्योग अगदी सराईतपणे करायचा. त्याच्यासाठी ते एक फक्त खेळणे होते. पण विनोदाचा भाग म्हणजे हाच computer मी computer engineering ला admission घेईपर्यत बघितला देखिल नव्हता. आमच्या पहिल्या वहिल्या computer Lab च्या practical ला आम्हाला आमच्या professor ने मुलांनो 'हा keyboard बरका, आणि हा monitor, '' असे दाखविले होते. आताच्या मुलांना हसु येईल हे ऐकुन कदाचित. engineering च्या प्रथम वर्षाला असतांना 2 drive वाले computer होते. म्हणजे hard disk नव्हती P.C.'s ना. वरच्या drive वरती floppy टाकुन computer boot करायचा आणि खालच्या drive मधिल floppy मधे data save करायचा असा आमचा उद्योग चालायचा. मग 2nd year ला असतांना hard disk वाले computers आले. आणि अजुन एक गंमत म्हणजे मी engineer झाल्यानंतर windows operating system आली. आम्ही आपले DOS वरती काम करायचो.

अशा आणि अनेक बालपणीच्या आठवणी माझ्या डोळ्यासमोर तरळुन गेल्या.
पण खरंतर प्रत्येक पिढीत असा बदल होणारच.. त्यालाच तर generation gap म्हणतो आपण. कदाचित माझ्या आई-वडिलांना आम्ही लहान असतांना हेच वाटले असेल कि किती फरक आहे ह्यांच्या आणि आपल्या खेळांमधे, मनोरंजनाच्या प्रकारामधे.. प्रत्येक पिढीत नविन नविन तंत्रज्ञान हे येणारच आणि बदल हे घडणारच. माझ्या मुलालादेखिल त्याच्या बालपणीच्या अशाच अमुल्य आठवणी रहातील. रहावोत.